आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात बाभळीच्या झाडाकडे लोक ढुंकूनही पहात नाहीत असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत सूचक टोला लगावला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त सुप्रिया सुळे ठाण्यात आल्या होत्या. यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांनीच आणला. किंबहुना त्यांच्यामुळेच महाराष्ट्राकडे प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून पाहिले जात आहे. नवीन तंत्रज्ञान आणि नवे विचार हे महाराष्ट्रातच येतात अन् त्यानंतर ते देशभर पोहचते. आज देशामध्ये स्टार्टअपची जी चर्चा सुरु आहे. त्याकडे पाहता केंद्र सरकारचाच अहवाल सांगत आहे की, देशातील सर्वात जास्त स्टार्टअप कुठे असतील तर ते केवळ महाराष्ट्रातच आहेत असं सुळे यांनी सांगितलं. चीनचा विषय महत्वाचा आणि गांभीर्याने घेण्यासारखा आहे. आपण संसदेमध्ये अनेकवेळा युद्धविरोधी भूमिका घेतली आहे. कारण, युद्धामध्ये कोणीही जिंकत नाही. युद्धामध्ये केवळ महिला विधवा होतात आणि बालके अनाथ होतात. युद्धाने प्रश्न सुटत नाहीत. आमचा विचार आता पंतप्रधान मोदी यांनीही स्वीकारला आहे. छप्पन इंच वगैरे या गोष्टी भाषणापुरत्या ठिक आहेत. पण वास्तवात त्याचा काही उपयोग नसतो, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी लगावला.