रेड झोनमध्ये आंबा वाहतुक करून परतणाऱ्यांना कोकणात क्वारंटाईन केलं जात असल्यानं आंबा आपल्या दारी या चळवळीला ग्रामधोरणामुळे खीळ बसण्याची चिन्हं दिसत आहेत. कोरोनासारख्या महामारीच्या साथीमध्येही कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना “आंबा आपल्या दारी” या चळवळीने उभारी मिळुन बऱ्यापैकी मदतीचा हात लाभला होता. मात्र आता मोठमोठ्या शहरांचा समावेश रेड झोनमध्ये झाल्याने या क्षेत्रात आंबा वाहतुक करणाऱ्यांनाच कोकणात क्वारंटाईन केले जात असल्याने आंबा वाहतुक रोडावली आहे. कोकणातील जिल्हा प्रशासनाच्या ग्रामधोरणामुळे या चळवळीलाच खीळ बसण्याची चिन्हे दिसत आहेत. तेव्हा सरकारने कोकणातील आंबा वाहतुकदारांसाठी नियम शिथील करावेत अशी प्रतिक्रीया आंबा उत्पादकाकडून व्यक्त होत आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी आमदार संजय केळकर आणि ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे सिताराम राणे यांनी “आंबा आपल्या दारी” चळवळ सुरू केली. त्यामूळे लॉकडाऊनमध्येही हापूस आंबा ठाणेकरांना थेट दारी मिळण्यासह आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठीही विक्रीचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला होता. मात्र मुंबई, पुणे आणि ठाणे या क्षेत्राचा समावेश रेड झोनमध्ये झाल्याने या क्षेत्रात आंबा वाहतुक करून परतणाऱ्यांना आता कोकणात क्वारंटाईन केले जात आहे.त्यामुळे मुंबई-ठाण्यासह पुण्यात आंबा वाहतुक करण्यासाठी कुणीही वाहनचालक अथवा कामगार धजावत नसल्याने आंबा उत्पादकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.