बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेस २० द.ल.ली. प्रतिदिन शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज महापालिका आयुक्तांनी टॅपिंग स्थळांची पाहणी करून अतिरिक्त पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. या अतिरिक्त पाणी पुरवठ्यामुळे कोपरी आणि वागळे इस्टेट या भागातील पाणीटंचाईची समस्या कायमची दूर होणार आहे. ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी मुंबई महापालिकेच्या कोट्यातील 20 दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी कोपरी आणि वागळे इस्टेट परिसरासाठी अतिरिक्त पाणी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात आली आहे. ठाणे महालिकेच्यावतीने आनंदनगर, सेवा रस्ता धर्मवीर नगर, भटवाडी, किसननगर पश्चिम, किसन नगर पूर्व या ठिकाणी टॅपिंग देऊन शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये आनंदनगर परिसरास ६ द.ल.ली., वागळे इस्टेट १० द.ल.ली., भटवाडी २ द.ल.ली., किसननगर, क्र.२ साठी १ द.ल.ली. तर किसननगर क्र.१ साठी १ द.ल.ली पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी कोपरी आनंदनगर, सर्व्हिस रोड धर्मवीर मार्ग, किसननगर भटवाडी, किसननगर पश्चिम, किसन नगर पूर्व या टॅपिंग स्थळांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त पाणी पुरवठा वेळेत सुरु होण्यासाठी जलजोडण्याची कामे तात्काळ करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. या अतिरिक्त पाणी पुरवठयामुळे कोपरी आणि वागळे इस्टेट परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून पाणी प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी यावेळी सांगितले.