अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली ७२ वर्ष देशभरात सुसंस्कृत आणि देशभक्त विद्यार्थ्यांची फळी उभारण्याचे काम अविरत करत आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक, विविध जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थिती मध्ये अभाविप प्रत्येक वर्षी प्रदेश अधिवेशन आयोजित करत असते. त्याच अनुषंगाने या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोंकण प्रांत अधिवेशन मुंबईत झालं. दरवर्षी अधिवेशनात प्रांतातील २५ जिल्ह्यातील वर्षभरातील कार्यक्रमांची प्रदर्शनी करण्यात येते. यावर्षी प्रदर्शनीला गायत्री धर्मे यांचे नाव दिले होते. या अधिवेशनात १३२ विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रदेश अधिवेशनात शैक्षणिक समस्यांवर अभाविप ची पुढील वर्षभरातील आगामी भूमिका ठरवण्यात आली.त्याचसोबत विविध शैक्षणिक,सामाजिक मुद्द्यांवर चर्चा आणि प्रस्ताव पारित करण्यात आले. येत्या काळात विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात संशोधनात्मक कार्य करण्याची गरज आहे असे मत प्रमुख अतिथी आशिष कुमार चौहान यांनी व्यक्त केले. २०२०-२१ या वर्षासाठी प्रेरणा पवार यांनी प्रदेश मंत्री तर मंदार भानुशे यांनी प्रदेश अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.राष्ट्रीय शिक्षा धोरण २०२० च्या अंमलबजावणी करता शासनानं त्वरित कार्यवाही करावी,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मिळाव्यात, अधिकाऱ्यांनी शिष्यवृत्ती संदर्भात वेळखाऊ वृत्ती बंद करावी, विलगीकरणासाठी वापरण्यात आलेली वस्तीगृह पुन्हा विद्यार्थ्यांसाठी खुली करावीत, राज्य सेवा आयोगा साठी पूर्णवेळ संचालकांची नेमणूक करावी, कमवा आणि शिका योजनेची व्याप्ती वाढवावी, महाविद्यालयं टप्प्याटप्प्याने सुरू करावीत अशा मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देखील अभाविप कोंकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार यांनी दिला.