अंतिम मतदारयादी अद्ययावत आणि अचूक असण्याची दक्षता घ्या असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनकुमार यांनी केलं आहे. कोकण विभागाचा आढावा अश्विनकुमार यांनी घेतला त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. मतदार याद्यांबाबत मतदारांच्या हरकती आणि दावे निकाली काढताना मतदारांचा तपशील नाव, वय, पत्ता, लिंग आणि छायाचित्र ओळखपत्रामध्ये कोणत्याही त्रृटी आणि विसंगती राहणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना अश्विनकुमार यांनी केली. अंतिम मतदारयादी जास्तीत जास्त अद्ययावत आणि शुध्द स्वरूपात तसंच अचूक तयार होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. मतदार यादीतील दुय्यम, अनेकविध, समान नोंदी, मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेले मतदार, अपात्र आणि चुकीच्या नोंदी असलेल्या मतदारांची आणि मतदार यादीतील संगणकीय, तांत्रिक आधारावर चुकीच्या असलेल्या नोंदी वगळण्याबाबत काळजी घेण्यासही अश्विनकुमार यांनी सांगितलं.