केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या मोटर वाहन कायद्यातील अन्यायकारक तरतुदींविरोधात काँग्रेसनं आज रविंद्र आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडलं. मोटर वाहन कायद्यातील जाचक दंड रद्द करा, आधी सुस्थितीतील रस्ते द्या आणि मगच दंड आकारा अशा घोषणांनी हा परिसर दणाणून सोडला. केंद्र सरकारनं मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सध्या तूर्त ही अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली असून भविष्यात मोठ्या दंडाची टांगती तलवार असल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर आज मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मागण्यांचं एक निवेदन यावेळी देण्यात आलं. आगामी काळात कायद्यातील जाचक तरतुदी रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रविंद्र आंग्रे यांनी दिला आहे.