मराठी कामगारांना कामावरून काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. सूरज वॉटर पार्क प्रशासनानं दोन मराठी कामगारांना कामावरून काढून टाकलं होतं. याचा जाब विचारण्यासाठी अविनाश जाधव सूरज वॉटर पार्कमध्ये गेले होते. त्यावेळी हा मारहाणीचा प्रकार घडल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. सूरज वॉटर पार्क प्रशासनानं शिवाजी हेलाले आणि पुरंदर पाटील या दोघा कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकलं होतं. याचा जाब विचारण्यासाठी अविनाश जाधव आपल्या १५-२० कार्यकर्त्यांसह सूरज वॉटर पार्क येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी सूरज वॉटर पार्कचे मॅनेजर लक्ष्मण कटी यांना मारहाण केल्याची तक्रार पार्कचे सुपरवायझर सागर यादव यांनी कासारवडवली पोलीसांकडे दिली होती. या तक्रारीनंतर हे गुन्हे दाखल झाले आहेत. अविनाश जाधव यांनी मात्र अशा कोणत्याही मारहाणीचा इन्कार केला असून केवळ क्लोज सर्कीट कॅमे-याची केबल खेचल्याचं अविनाश जाधव यांचं सांगणं आहे.