ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग टप्पा १ मधील बोगद्याच्या कामाची खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या अधिका-यांसमवेत अलिकडेच पाहणी केली. ऐरोली ते मुंब्रा वाय जंक्शन या टप्प्यातील ६ मार्गिका आणि बोगद्याचं काम युध्दपातळीवर सुरू असल्याचं पाहून श्रीकांत शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं. ऐरोली ते मुंब्रा आणि मुंब्रा ते काटई रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे आणि याचा सर्वाधिक फायदा हा कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील रहिवाशांना होणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्वत्वानंतर काटई ते ऐरोली हा प्रवास फक्त १० मिनिटात पूर्ण होणार आहे. शीळफाट्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्यानं खासदार श्रीकांत शिंदे या कामाचा पाठपुरावा करत आहेत. पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावरील सर्व बोगद्यांपेक्षा जास्त लांबीचा बोगदा हे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. या पाहणी दरम्यान उन्नत मार्ग टप्पा १ आणि बोगदा टप्पा १ ही दोन्ही कामं नियोजित वेळेत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवा असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.