ठाणे महापालिका प्रशासनानं मलनिस्सारण वाहिन्यांचं काम चालू असताना विशेष दक्षता न घेतल्यानं घोडबंदर परिसरात रस्ते खचले असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई यांनी २ जानेवारीला घोडबंदर रस्ता परिसरातील मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याच्या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत पालिका आयुक्तांना अवगत केलं होतं. मलनिस्सारण वाहिन्या टाकताना कुठल्याही प्रकारच्या मजबुतीकरणाशिवाय मातीवर वाहिन्या टाकल्या जात आहेत. या वाहिन्या टाकताना त्याचा पाया मजबूत नसल्यामुळं पावसाळ्यात कॉन्क्रीट किंवा डांबरी रस्ता खचून जमीन खचणार आहे. यामुळं मलनिस्सारण वाहिन्या नादुरूस्त होण्याबरोबरच रस्ताही खराब होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं देसाई यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणलं होतं. महापालिका क्षेत्रामध्येच बहुतांश ठिकाणी अशाप्रकारचं काम सुरू असून एकही अधिकारी कामाची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष स्थळावर आला नसल्याची गंभीर बाबही देसाई यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणली होती आणि याप्रकरणी योग्य ती दखल घेण्याची विनंती सुहास देसाई यांनी पालिका आयुक्तांना केली होती. मात्र यावर काहीच न झाल्यामुळं अपेक्षेनुसार मोठ्या प्रमाणावर रस्ते खचल्याचं दिसत आहे.