शहरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या शहरांना पाणीपुरवठा करणा-या भातसा आणि बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत आहे. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ४४ मिलीमीटर पाऊस झाला आहे तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर असून या धरणात सध्या ६२० दशलक्ष घनमीटर म्हणजे ६६ टक्के पाण्याचा साठा आहे. बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ३३८ दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात १९१ दशलक्ष घनमीटर म्हणजे ५७ टक्के पाणी साठा आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी आणखी काही दिवस पावसाची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी याच काळात भातसामध्ये ९० टक्के तर बारवीमध्ये ९७ टक्के पाणी साठा होता.