ठाण्यामध्ये इलेक्ट्रीक बस चालवण्याबाबत मुंबई महानगर प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी अनुकुलता दर्शवली आहे. शहरातील प्रदूषणावर मात करण्यासाठी परिवहन सेवेतर्फे इलेक्ट्रीक बस चालवण्यात याव्यात अशी मागणी परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी केली होती. त्या अनुषंगाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आर. ए. राजीव यांना सूचना केल्यानंतर त्यांनी या संदर्भात निधी उपलब्ध करून देण्यास अनुकुलता दर्शवली आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रीक बस हा मोठा पर्याय आहे. या बसेस ठाण्यात धावल्यास प्रवास खर्चातही कपात होऊ शकते. त्यामुळं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ५० इलेक्ट्रीकल बसेस परिवहन सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शमीम खान यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली होती. काल मंत्रालयामध्ये एक बैठक झाली. या बैठकीमध्ये आव्हाड यांनी राजीव यांच्याशी संपर्क साधून निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर शमीम खान यांनी आर ए राजीव यांची भेट घेऊन या संदर्भातील भूमिका विषद केली त्यावर आर ए राजीव यांनी याबाबत अनुकुलता दर्शवून लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं.