कोरोनामुळे सर्व माध्यमिक शाळा बंद आहेत मात्र काही दिवसांपासून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवाद निर्माण व्हावा या हेतूने ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या काळात आनंददायी आणि नाविन्यपुर्ण अध्ययन सुरू ठेवा अशी सूचना जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी मुख्याध्यापकांना केली आहे. गेल्या तीन दिवसापासून त्यांनी माध्यमिक विभागाचा दृकश्राव्य आढावा घेतला. या बैठकीला अधिकारी, मुख्याध्यापक, मुख्याध्यापक संघ पदाधिकारी सहभागी होते. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, मनोबल उंचावणे गरजेचे असल्याचे सांगत सर्व मुख्याध्यापकांनी शिक्षकांशी झुम अॅप द्वारे संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्याध्यापकांनी तत्काळ उपक्रम अंमलबजावणी सुरू करून सर्व वर्ग शिक्षक आणि विषय शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना दररोज वेळ निश्चित करून समुपदेशन आणि अध्यापन करावे. तसेच पालक आणि शिक्षक यांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची चिंता न बाळगता सर्वांनी वेळेचा सदुपयोग करून सर्व घटकांत सकारात्मक चैतन्य निर्माण करावे असे शिक्षणाधिका-यांनी यांनी सांगितले.