रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज येताच, परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरात राहून, गॅलरित, गच्चीत, खिडकी जवळ येऊन उस्फुर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करत कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आलेल्या ठाणे ग्रामीणच्या व्यक्तीचे स्वागत केले. कोरोनामुळे भीतीच्या सावटाचे वातावरण आजूबाजुला आहे. कल्याणच्या परिसरात काही दिवसांपूर्वी संशयित म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यावर सर्व वैदकीय सोपस्कार पूर्ण करून बुधवारी घरी आणण्यात आले, तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी त्याचे टाळ्यांची आतषबाजी करत स्वागत केले.
ज्या व्यक्ती, कुटुंबाना केवळ घरात अलगीकरण केले आहे अशा व्यक्तींकडे देखील भीतीच्या भावनेने नागरिक पाहताना दिसत असताना कल्याण मधील ही उस्फुर्त घटना संबंधीत व्यक्ती आणि कुटुंबाला सकारात्मक बळ देणारी आणि त्याचा आत्मसन्मान वाढवणारी आहे. ठाणे ग्रामीण हद्दीतील हा व्यक्ती असल्याने पुढील काही काळासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे आणि टीम पूर्णतः संपर्क ठेवून असणार आहे. ठाणे ग्रामीण मध्ये तीन व्यक्तींपैकी दोन व्यक्तींना निगेटिव्ह अहवालानंतर घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे.