गुन्हे शाखेच्या बाल संरक्षण पथकानं ठाण्यामध्ये होणारा बालविवाह रोखला आहे. सलाम बालक चाईल्ड लाईन संस्थेतर्फे कळव्यातील शांतीनगर झोपडपट्टीमध्ये बालविवाह होणार असल्याची माहिती देऊन हा बालविवाह रोखावा अशी विनंती पोलीसांना केली होती. त्यानुसार बाल संरक्षण पथकानं कळव्यातील शांतीनगर झोपडपट्टी येथील साईबाबा मंदिराजवळ शंकर कांबळे आणि ललिता जाधव या दोघांचा विवाह लावून देण्याची तयारी सुरू असल्याचं पाहिलं. शंकर हा १९ वर्षाचा तर ललिता ही १६ वर्षाची होती. हळदीचा कार्यक्रम सुरू असताना या पथकानं हे लग्न रोखले आणि शंकर तसंच ललिता आणि त्यांच्या कुटुंबियांना कळवा पोलीस ठाण्यात आणून बालविवाह न करण्याबाबत त्यांचं मनपरिवर्तन करण्यात आलं.