काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविरूध्द केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ टेंभीनाका येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करण्यात आलं. गेले काही महिने राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असून या यात्रेनं काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात प्रवेश केला. महाराष्ट्रातील आपल्या यात्रेदरम्यान काल राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफी वीर असल्याचं म्हटलं होतं. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया राज्यभरात उमटल्या. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी राहुल गांधींची यात्रा राज्यात बंद करावी अशी मागणी केली होती आणि त्यांच्या विरोधात आंदोलन करावं असं म्हटलं होतं. त्याच्या प्रतिक्रिया आज उमटल्या. टेंभीनाका येथे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.