लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबरचे एकूण २२७ गुन्हे दाखल झाले आहेत. काही गुन्हेगार आणि समाजकंटक लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असून त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलत गुन्हे दाखल केले असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
टिकटॉक, फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात 227 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी 8 गुन्हे अदखलपात्र आहेत. यामध्ये मुंबई १६, ठाणे शहर ६, नवी मुंबई ५, ठाणे ग्रामीण १ यांचा समावेश आहे. आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १०४, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ७५, टीक-टॉक विडिओ शेअर प्रकरणी ४, ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ३ तर अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्या प्रकरणी ३९ गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत ४६ आरोपींना अटक केली आहे. व्हॉटस् अॅपवर मोबाईल रिचार्ज ऑनलाईन करण्यासाठी किंवा कोणत्याही वेबसिरीजचे सबक्रिप्शन स्वस्तात आहे अशा लिंक फॉरवर्ड होत असून याद्वारे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. याद्वारे समोरच्याकडून माहिती काढून घेतली जाते आणि फसवणूक केली जाते. असे प्रकार घडल्यास www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर नोंद करावी असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आलं आहे.