राज्यस्तरीय विज्ञान संमेलनात सहभागी होऊन विज्ञान प्रकल्पास सातवा क्रमांक मिळवून देणा-या सिग्नल शाळेतील अतुल पवार आणि किरण काळे या दोन मुलांची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. या मुलांनी मिळवलेलं यश कौतुकास्पद असल्याचं सांगून महापौरांनी या दोन मुलांचा सत्कार केला. ठाणे महापालिका पुरस्कृत आणि समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेच्या मुलांनी मिळवलेलं यश अभिमानास्पद आहे. खा-या पाण्यापासून गोडं पाणी बनवण्याचा प्रयोग डोंबिवलीतील विज्ञान प्रदर्शनात या मुलांनी सादर केला होता. राज्यातील १०० हून अधिक शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सिग्नल शाळेचा सातवा क्रमांक आला. सिग्नल शाळेतील अतुल पवार आणि किरण काळे या दोन मुलांची इस्रो भेटीसाठी निवड करण्यात आली आहे. येत्या २० ते २४ जानेवारी दरम्यान हे दोघे इस्रोला भेट देणार असून सलग तीन दिवस तिथे राहून इस्रोबाबत माहिती घेणार आहेत. शाळेच्या विज्ञान प्रदर्शनातील प्रकल्पास मार्गदर्शन करणारे प्राध्यापक बाळासाहेब खोल्लम, आरती परब, सुमन शेवाळे आणि भटू सावंत यांचंही महापौरांनी यावेळी कौतुक केलं.