भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांनी आपल्या जाहीरनाम्यात ठाणे गतीमान करण्याचा संकल्प मांडला आहे. काल एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. शहरातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना, मेट्रो आणि जलवाहतुकीच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्राधान्य, परिवहन सेवा सक्षम करण्यावर भर, ठाण्याच्या पुनर्विकासाला चालना तसंच शिक्षण, आरोग्य, पार्कींग अशा गोष्टींना या जाहीरनाम्यात स्थान देण्यात आलं आहे. आपल्या जाहीरनाम्यात संजय केळकर यांनी शहर गतीमान कसं होईल या दृष्टीकोनातून विचार मांडले आहेत. वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी महापालिकेच्या सहाय्यानं ठिकठिकाणी वाहनतळाची उभारणी, रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीवर भर, अंतर्गत मेट्रोसाठी पाठपुरावा, परिवहन सेवेच्या ताफ्यात आणखी बसेस दाखल करून परिवहन सेवा सक्षम करण्याचा संकल्प केळकर यांनी आपल्या जाहीरनाम्यात मांडला आहे.