ठाण्यातील बी.जे हायस्कूलचे बांधकाम पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे बंद

ठाण्यातील बी.जे हायस्कूलचे बांधकाम पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे बंद पडलं आहे. २०१२ मध्ये शाळेचं भूमीपूजन झालं होतं. पण प्रत्यक्षात काम सुरू होण्यास दोन वर्ष लागली. त्यानंतर सुध्दा शाळेचं काम संथगतीनं सुरू होतं. शाळेचं काम उशीरा सुरू झाल्यानं ७ कोटींचा निधी परत पाठवावा लागला. आता जिल्हा परिषदेला १ कोटीचा निधी मिळाला आहे पण तो अजून त्यांच्याकडे आलेला नाही. त्यामुळं शाळेचं काम बंद आहे. गेल्यावर्षीच्या आर्थिक वर्षात शाळेच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेनं निधीची तरतूद करणं आवश्यक होतं. पण तसं न केल्यानं यावर्षी शाळेचं काम पूर्ण होऊ शकत नाही. अलिकडेच बी.जे हायस्कूल माजी विद्यार्थी असोसिएशन आणि पारसी ट्रस्टच्या पदाधिका-यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांची भेट घेतली. परंतु त्यांनी थातुरमातुर उत्तरं देऊन बोळवण केली. शहरातील ऐतिहासिक शाळेच्या बांधकामासाठी शासनानं केलेलं दुर्लक्ष आणि जिल्हा परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे शाळा चालू होईल का ? असा प्रश्न माजी विद्यार्थी, पारसी ट्रस्ट आणि शाळेतील विद्यार्थ्यांना पडला आहे. जिल्हा परिषदेबरोबर झालेल्या प्रत्येक बैठकीत फक्त तोंडी आश्वासनं दिली जात आहेत. लेखी आश्वासनं देऊ शकत नाही असं परिषदेकडून सांगितलं जातं. त्यामुळं आता पारसी ट्रस्ट आणि माजी विद्यार्थी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. अधिका-यांकडून वारंवार मिळणा-या अशा उत्तरांमुळे ही शाळा बंद करून एखाद्या राजकीय नेत्याच्या संस्थेला किंवा खाजगी शिक्षण संस्थेला देण्याचा घाट घातला आहे की काय असा संशय विद्यार्थी आणि पारसी ट्रस्टला येत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading