महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथी निमित्ताने त्यांना केवळ पुष्पहार अर्पण करून अभिवादन न करता त्यांच्या विचारांचा प्रसार व्यापक स्वरूपात झाला पाहिजे. यासाठी यापुढे ठाणे महापालिकेच्या वतीनेच पुढाकार घेण्यात येणार असून थोर विचारवंतांच्या व्याख्यानांमधून महापुरुषांच्या विचारांचा जागर केला जाणार असल्याचे प्रतिपादन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे विशिष्ट समाजापुरते नसून त्यांचे विचार हे वैश्विक स्वरूपातील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ठाण्यातील पत्रकारांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पत्रकार कक्षात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भाषणात माजी महापौर नरेश म्हस्के यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबाबद्दल विशेष उल्लेख करून आजच्या पत्रकारांनी देखील बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा आदर्श घ्यायला हवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पत्रकारांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा हा आयामही ध्यानात घेतला पाहिजे, असे आवाहन केले. या अभिवादन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.