श्रीदत्तजयंतीचा उत्सव आज मोठ्या भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा

श्रीदत्तजयंतीचा उत्सव आज मोठ्या भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोनाची कोणतीही बंधनं यंदा नसल्यामुळे दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मार्गशीर्ष पौर्णिमा प्रदोषकालव्यापिनी असेल त्या दिवशी श्रीदत्तजयंती उत्सव साजरा करावा असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. प्रदोषकाल म्हणजे सूर्यास्तानंतर रात्रीमानाचा एक पंचमांश काल ‘ प्रदोषकाल असतो अशी माहिती पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी दिली. ब्रह्मा, विष्णू आणि महेशत्मक त्रिमूर्तींची लोकप्रियता वाढल्यानंतर इ. सन १००० च्या सुमारास किंवा त्यानंतर दत्तात्रेयाला त्रिमुखी स्वरूप देण्यात आले. दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्याच्या ठायी ब्रह्मा-विष्णू-महेश या तिघांचेही अंश प्रकटले आहेत असे मानले जाऊ लागले. ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली. विष्णू संवर्धन, पालन करतो आणि भगवान शंकर तिच्यातील वाईट गोष्टींचा लय करतो अशी श्रद्धा आहे. दत्तात्रेय हा विष्णूच्या चौवीस अवतारांपैकी सहावा अवतार मानला जातो. काही संशोधकांच्या मते हा चौथा किंवा सातवा अवतार आहे. श्रीदत्तजयंतीचं औचित्य साधून शहरातील विविध भागांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध दत्तमंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दत्तजयंतीनिमित्त दत्तमंदिरांवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. दत्तमंदिरांप्रमाणेच साईबाबा मंदिर, स्वामी समर्थ मठांमध्येही पारंपरिक पध्दतीनं हा उत्सव साजरा करण्यात आला. तर विविध ठिकाणी भंडा-याचंही आयोजन करण्यात आलं होतं. दत्तजयंतीचा उत्सव काहीजण घरातही साजरा करतात. ठाण्यातील विठ्ठल सायन्ना दत्तमंदिर, मखमली तलाव येथील दत्तमंदिर, चव्हाण दत्त मंदिर, चेंदणी कोळीवाड्यातील दत्तमंदिर आणि कौपिनेश्वर येथील दत्तमंदिरात हजारो भाविकांनी श्री गुरूदत्तांचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्याचं दिसत होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading