मासुंदा तलावावरील सीगल पक्ष्यांना कृत्रिम खाद्य देऊ नये यासाठी वन विभाग सरसावला

मासुंदा तलावाचं आकर्षण ठरलेल्या सीगल्स पक्ष्यांना वाचवण्यासाठी वनविभाग सरसावला असून वन विभागातर्फे पक्ष्यांना खायला घालू नये यासाठी जनजागृती करण्यात आली. ठाण्याच्या मासुंदा तलावाचं सध्या रूपडं पालटलं असून सर्वसामान्य माणसांबरोबरच पक्षीही या तलावाकडे आकर्षित होत आहेत. गेले काही दिवस सीगल्स पक्ष्यांचे थवेच्या थवे या तलावावर विहारासाठी येत आहेत. मासुंदा तलावावर फिरायला येणारे अनेकजण भूतदयेपोटी या पक्ष्यांना आपल्याकडील अन्न खायला घालत आहेत. गाठी, शेव, पाव अशा प्रकारचं अन्न या पक्ष्यांना टाकून या पक्ष्यांच्या जीवाशीच खेळ होत आहे. याचा या पक्ष्यांना फायदा होण्याऐवजी तोटा होत आहे. या विरोधात पक्षी प्रेमी आणि पर्यावरण प्रेमींकडून आवाज उठवला जात आहे. गेल्यावर्षीही अशी जनजागृती करण्यात आली होती. पण तरीही पक्ष्यांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. वन विभाग आणि वन्य प्राणी प्रेमींकडून काल पुन्हा कृत्रिम खाद्य या पक्ष्यांना देऊ नये म्हणून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पक्ष्यांना खाद्य टाकणा-यांना वन विभागानं आवाहन करत रोखण्याचा प्रयत्न केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading