कृषी विषयक तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती शेतक-यापर्यंत पोहचवणं, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी, सक्षमीकरण, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृंखला विकसित करणे या उद्देशानं ७ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत डोंबिवलीमध्ये जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या प्रदर्शनाचं उद्घाटन कृषी आणि फलोत्पादन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कृषी महोत्सवात विविध परिसंवाद, चर्चासत्रं, प्रदर्शनं यांचं आयोजन करण्यात आलं आहे. कृषी विषयक परिसंवाद, व्याख्यानं या माध्यमातून तसंच विचारांच्या देवाणघेवाणीतून शेतक-यांच्या समस्यांचे निवारण तसंच विक्रेता, खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजारभिमुख कृषी उत्पादन आणि विपणनास चालना दिली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या कृषी प्रदर्शनात ३० दालनं शासनाच्या विभागांची, ५ दालनं कृषी तंत्रज्ञान, ३० दालनं गृहोपयोगी वस्तू, ५ दालनं कृषी यंत्रसामुग्री आणि अवजारं त्याचप्रमाणे ५५ दालनं ही धान्यं आणि खाद्यपदार्थांची असतील. उत्पादक ते ग्राहक मालाची थेट विक्री करणारी २० केंद्रंही या महोत्सवात असतील असं यावेळी सांगण्यात आलं.