जिल्ह्यातून विविध मार्ग आणि महामार्ग जातात. दळणवळण मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण अधिक असून ते कमीतकमी कसे होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. विशेषत: दुचाकींचे वाढते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागानी कसोशीने प्रयत्न करावेत अशी सूचना जिल्हाधिका-यांनी केली आहे. परिवहन विभागातर्फे आयोजित राष्ट्रसुरक्षा पंधरवडा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिका-यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वाहन चालकांना मिळालेला परवाना म्हणजे गाडी चालवण्याचा हक्क नाही तर ती केवळ सुविधा आहे. रस्त्याचा उपयोग करण्याचा पादचारी आणि इतर लोकांचा हक्क तितकाच महत्वाचा असल्याचं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. यावेळी अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी ट्रॅफीक किर्तन सादर करून वाहतूक नियमांची रंजक पध्दतीनं माहिती दिली. यावेळी वाहतूक नियमांची माहिती देणारे स्टीकर्स, पुस्तिका आणि पताकांचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यामध्ये २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये अपघाताच्या प्रमाणात २४ टक्के वाढ झाल्याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सांगितलं.