ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यासाठी शाई धरणाला प्राधान्य द्यावं आणि या प्रकल्पासाठी मुंब्र्यातील लेझर शो, फ्लोटींग मार्केट अशा प्रकल्पांऐवजी शाई धरणाच्या निधीसाठी प्राधान्य द्यावं असे आदेश महापौरांनी दिले आहेत. ठाण्याची लोकसंख्या २० लाखांच्या पलिकडे गेली आहे. दरवर्षी पाणी पुरण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी कपात करावी लागते. यंदा तर अपेक्षेपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळं धरणातील पाणी साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळं शाई धरणाला प्राधान्य द्यावं असं महापौरांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं २००८ मध्ये विरोध केल्यामुळं शाई धरणाचं काम रखडलं ते अद्याप सुरू होऊ शकलेलं नाही. त्यामुळं भविष्यातील गरजेचा विचार करून शाई धरण बांधण्यासाठी पुढील काही वर्षांच्या अर्थसंकल्पांमध्ये शाई धरणासाठी नियमित तरतूद करून हा प्रकल्प लवकर पूर्ण करावा असे आदेश महापौरांनी दिले आहेत.