प्लॅस्टिकचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्लॅस्टिकबंदीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली असून सर्व शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या अधिसूचनेनुसार 1 जुलै पासून राज्यात कोणतीच प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरता येणार नाही तसेच सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणारे ग्लास, चमचे, वेगवेगळ्या वस्तूंचे वेष्टन प्लॅस्टिकचे वापरता येणार नाही, 1 जुलैपासून या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे आज झालेल्या सिटी टास्क फोर्सच्या बैठकीत ठाणे महापालिकेला देण्यात आले. प्लॅस्टिकचा वापर हा सर्वांना भेडसावणारा प्रश्न ठरत आहे. प्लॅस्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाट होत नसल्यामुळे प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून 1 जूलै पासून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्लॅस्टिक वापरासंदर्भात जनजागृती करण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी आज टास्क फोर्सच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. यापुढे कोणत्याही प्रकारची कॅरीबॅग वापरता येणार नाही, याबाबत महापालिकेने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध करावी. प्लॅस्टिकचे निर्मुलन करण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, बाजारपेठा तसेच मांस, मटण, मासळी आणि इतर व्यावसायिक यांचेकडून प्लॅस्टिकचा वापर झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. ही मोहिम दर आठवड्याला प्रभावीपणे राबवावी. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकबंदीबाबत शपथ देऊन रॅलीचे आयोजन करावे. मॉल्समध्ये जनजागृती करावी असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. नागरिकांनी देखील प्रतिबंधीत प्लॅस्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्लॅस्टिक कचरा इतरत्र न टाकता सुका कचरा व्यवस्थापन केंद्राकडे जमा करावा, कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर जास्तीत जास्त करावा. साहित्य, वस्तू खरेदी करताना दुकानदारांना प्लॅस्टिक पिशव्यांचा आग्रह धरु नये तसंच महापालिकेच्या उपक्रमास सहकार्य असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.