यावर्षी बुधवार १५ जानेवारी या दिवशी मकरसंक्रांती आहे. मकरसंक्रांती ही अशुभ असते असा आपल्याकडे समज आहे. त्यात काही तथ्य नाही. सूर्याने मकर राशीत प्रवेश केला की आपल्या इथे दिनमान वाढत जाते. दिनमान वाढत जाणे हे अशुभ किंवा वाईट कसे असू शकेल असा प्रश्न उपस्थित करून खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी मकरसंक्रांतीचे महत्व सांगितले. सूर्याने रविवार २० डिसेंबर २०१९ रोजी सायन मकर राशीत प्रवेश केला. या दिवशी उत्तरायणारंभ म्हणजेच सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो. त्या दिवसापासून आपल्या इथे दिनमान वाढत जाते. आपली पंचांगं ही निरयन पध्दतीवर आधारलेली असल्यानं सूर्य निरयन मकर राशीत ज्या दिवशी प्रवेश करतो त्याप्रमाणे मकरसंक्रांतीचा दिवस ठरतो. यावर्षी १४ जानेवारी रोजी उत्तररात्री २ वाजून ८ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे त्यामुळं निरयन मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार १५ जानेवारी रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असल्याचं सोमण यांनी सांगितलं. मकरसंक्रांतीचा सण हा नेहमी १४ जानेवारीला येतो हे खरे नाही. मकरसंक्रांतीचा सण हा इंग्रजी तारखेवर अवलंबून नसून सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटं १० सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगेरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतक पूर्तीच्या अंकास ४०० ने भाग जात नसेल तर ते लीप वर्ष धरले जात नाही त्यामुळं मकरसंक्रांतीचा सण दर ४०० वर्षांनी ३ दिवस पुढे जातो. तसंच दरवर्षीचा ९ मिनिटं १० सेकंद हा काळ साठत जाऊन दर १५७ वर्षांनी तो आणखी एक दिवसानं पुढे जातो. सन २०० मध्ये मकरसंक्रांती २२ डिसेंबरला येत होती. १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. १९७२ पर्यंत १४ जानेवारीलाच येत होती. पण १९७२ पासून २०८५ पर्यंत मकरसंक्रांत कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येणार आहे. सन २१०० पासून मकरसंक्रांती १६ जानेवारीला येईल असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.