स्वामी विवेकानंदांच्या विश्व बंधुत्वाच्या संकल्पनेला विविध महात्मांच्या विचारांचं अधिष्ठान होतं असं मत सुप्रसिध्द निवेदिका धनश्री लेले यांनी व्यक्त केलं. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या विश्व बंधुत्वाच्या कल्पनेत संत ज्ञानेश्वरांचे पसायदान, संत नामदेवांची भक्ती, संत एकनाथांची तोल साधण्याची वृत्ती आणि संत तुकाराम महाराजांची शब्दांची तळमळ तसंच धर्म आणि आत्मउन्नतीचा रामदास स्वामींचा विचार होता असे लेले यांनी सांगितलं. विवेकानंदांच्या व्यापक विचारांकडे दूषित वृत्तीनं पाहू नका, त्यांच्या विचारांकडे स्वच्छ दृष्टीनं पाहणं ही काळाची गरज असल्याचंही लेले यांनी सांगितलं. आपल्या संस्कृतीत धर्म, विज्ञान आणि अध्यात्म या संकल्पना स्पष्ट आहेत. आपली संस्कृती सर्व धर्मांना सामावून घेते. आपल्या संस्कृतीला आपल्या धर्माची परंपरा आहे. वैविध्याशिवाय आपल्या समाजाची प्रगती होणार नाही हा त्यांचा विचार होता. शाळांमधून धर्माचे शिक्षण दिले गेले तर अंधश्रध्दा दूर होतील असं मत लेले यांनी व्यक्त केलं. आपण ज्या राष्ट्रात राहतो त्या राष्ट्राप्रती कृतज्ञतेची भावना असलीच पाहिजे. राष्ट्रीयत्वाच्या भावनांचा विसर पडता कामा नये, यासाठी स्वामी विवेकानंदांनी अखंड प्रयत्न केले. त्यांच्या विचारांचं स्मरण आपण प्रत्येकानं केलेच पाहिजे अशी अपेक्षा धनश्री लेले यांनी यावेळी व्यक्त केली.