नवी मुंबईतील सुल्झर पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी १५ एप्रिलपासूनच बेकायदेशीरपणे सुरू असल्याच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईज् युनियनने दिला आहे. केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार २० एप्रिल पासून अत्यावश्यक सेवा पुरवाणा-या कंपनी मालकांना उत्पादन काढण्याची परवानगी देण्यात आली असताना सुल्झर पंप्स मात्र १५ एप्रिल पासूनच कंपनी बेकायदेशीरपणे पुन्हा चालू केली आहे. कंपनी सुरु करण्यापूर्वी कंपनीने तशी परवानगी घेतली नसून सरकारी यंत्रणेची दिशाभूल केली आहे.
सुल्झर पंप्स् ही अत्यावश्यक सेवांच्या कक्षेत बिलकूल येत नाही हे माहित असूनही कंपनी बेकायदेशीररित्या सुरु करण्यात आली आहे. सोशल-डिस्टन्सिंगचा बोजवारा उडवून आणि सरकारी निर्देश धाब्यावर बसवत कामगारांचा जीव धोक्यात टाकून कामगारांकडून काम करवून घेण्यात येत आहे. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करण्याची आणि सरकारी सूचनांचं तंतोतंत पालन करण्यासंबंधी युनियनने कंपनी व्यवस्थापनाला पत्र पाठवलेले आहे. मात्र, त्यावर ४८ तास उलटून गेल्यावरही कंपनी प्रशासनाने कुठलेही उत्तर देण्याचं साधं सौजन्यही दाखवलेलं नाही. त्यामुळे, न्यायालयात जाण्याचा इशारा युनियनने दिलेला आहे.