एका गृहिणीची फसवणूक केल्याप्रकरणी ए.एस.अॅग्री अॅण्ड अॅक्वा एल.एल.पी. या कंपनी मधील मुख्य संचालकांस ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. रमादेवी चिल्लपारेड्डी या आंध्रप्रदेशातील महिलेच्या तक्रारीवरून या कंपनीतील संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ए.एस. अॅग्री अॅण्ड अॅक्वा या कंपनीचे व्यवस्थापक/भागिदार आणि इतरांनी आपसात संगनमत करून रमादेवी यांना हळदीचे उत्पादनापासुन कुरकुमीन हे प्रोडक्ट तयार करण्याचा नविन प्रोजेक्ट सुरू करण्याकरीता 1 करोड रूपयांची गुंतवणुक केल्यास 16 महिन्यांनी 1 करोड रूपये आणि त्यानंतर पुढील 5 वर्षे प्रत्येक 12 महिन्यांनी 1 करोड असे एकुण 5 करोड रूपये मोबदला देण्याचे आश्वासन देवुन या महिलेचा विश्वास संपादन केला. या महिलेला कंपनीत 1 करोड गुंतवणुक करण्यास लावून तिला कोणताही प्रोजेक्ट सुरू करून न देता 1 करोड रकमेचा अपहार करून या महिलेची आर्थिक फसवणुक केली आहे. तसेच या महिलेला 1 करोड रूपयांची गुंतवणुक केल्यानंतर प्रोजेक्ट करीता त्यांची जमीन योग्य नाही असे सांगुन त्यांना दुसरी जमीन घेण्याकरीता खर्च करण्यास भाग पाडुन या महिलेचे 1 करोड 70 लाख रूपयांचे नुकसान केले आहे. तसेच आतापर्यतच्या तपासात प्राप्त झालेल्या तक्रार अर्जानुसार 150 गुंतवणुकदारांची एकुण 41,24,30,787/- रूपयांची फसवणुक झाली असून यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
या प्रकरणी संदिप सामंत आणि संदेश खामकर यांना अटक करण्यात आली आहे. तसंच ए.एस. अॅग्री अॅण्ड अॅक्वा कंपनीचे चेअरमन आणि सर्वाधिक नफयाच्या हिस्स्याचे भागिदार प्रशांत झाडे यांनाही अटक करण्यात आली असून पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे. ए.एस. अॅग्री अॅण्ड अॅक्वा एल.एल.पी.’ या कंपनी मध्ये गुंतवणुक केलेल्या सर्व गुंतवणुकदार यांनी आपल्या गुंतवणुकीचे कागदपत्रांसह ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्तांशी यासोबत जोडलेल्या पत्रकानुसार माहिती भरून संपर्क साधावा असं आवाहन पोलीसांनी केलं आहे.