रेमण्ड कंपनीच्या सुलोचनादेवी सिंघानिया रूग्णालयामध्ये आता शाळा होणार आहे. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या निधनानंतर संतप्त शिवसैनिकांनी या रूग्णालयाची १८ वर्षापूर्वी होळी केली होती. यानंतर विजयपत सिंघानिया यांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आईच्या नावे असलेल्या रूग्णालयाची होळी झालेली पाहून शिवसेनेविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पुन्हा कधीही रूग्णालय सुरू करणार नाही अशा संतप्त भावना विजयपत सिंघानिया यांनी त्यावेळी व्यक्त केल्या होत्या. आता या रूग्णालयाच्या जागेवर आयसीएसई बोर्डाची शाळा सुरू केली जाणार आहे. सध्या नर्सरी ते सहावीपर्यंतची ही शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जूनपासून सुरू होणार आहे. लवकरच या शाळेच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश दिले जाणार आहेत. या शाळेचे शुल्क काहीसे अधिक असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकूणच रूग्णालयाचं रूपांतर आता शाळेत होत असून सिंघानिया आता ठाणेकरांना या शाळेतून शिक्षणाचे धडे देणार आहेत.