भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची सामनाधिकारी ठाणेकर वर्षा नागरे आणि ठाण्यातील जुनी संस्था श्री मावळी मंडळ यांना मनोहर विचारे प्रतिष्ठानचा मराठी गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या रविवारी, १९ मार्चला मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात हे दोन्ही पुरस्कार देण्यात येईल. याच कार्यक्रमात ५० वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पहिला भारत केसरी किताब मिळवून देणारे जेष्ठ शरीरसौष्ठवपटू, राष्ट्रीय कबड्डीपटू अभिनेते विजू पेणकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय विचारे यांनी सांगितले. महिला क्रिकेटपटू वर्षा नागरे हिची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सामनाधिकारी म्हणून गतवर्षी निवड केली. तर मावळी मंडळ गेली आठ हून जास्त दशके ठाणे जिल्ह्यातील कबड्डीचा दादा संघ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या तर्फे आयोजित होणारी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आदर्श स्पर्धा म्हणून ओळखली जाते. जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी विजू पेणकर यांनी क्रीडा, कला, राजकारण अशी विविध क्षेत्रात मुशाफिरी करताना माझगाव विभागात मराठी शाळेला नावारूपाला आणले आहे.