सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ठाणेकर असलेल्या अभय ओक यांची नियुक्ती झाली आहे. अभय ओक यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात जिल्हा न्यायालयातून केली होती. ते जिल्हा न्यायालयातील वकील संघटनेचे सदस्य होते. काही वर्ष वकीली केल्यानंतर त्यांची मुंबई उच्चा न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयातही जवळपास १५ वर्षाहून अधिक काळ त्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम केलं. अनेक महत्वाचे निकाल त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिले. अगदी अलिकडे अभय ओक यांची कर्नाटकच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाली होती. आता त्यांची सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. साधारणत: दोन आठवड्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या न्यायवृंदानं ९ न्यायधिशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शिफारस केली होती. या शिफारसीमध्ये अभय ओक यांचीही सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून शिफारस करण्यात आली होती. आता या शिफारसीला पंतप्रधान कार्यालयानंही मान्यता दिली असून अभय ओक यांची सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. एका ठाणेकराची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होणं हा ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. अभय ओक यांचा जन्म २५ मे १९६० मध्ये झाला. विज्ञान शाखेतून पदवी मिळवल्यानंतर खरतर अभय ओक अभियंता होणार होते. मात्र त्यांनी विधी क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरामध्येही विधी क्षेत्राचीच परंपरा होती. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलएम केल्यानंतर त्यांनी २८ जून १९८३ मध्ये ठाणे जिल्हा न्यायालयात वकीली सुरू केली. त्यांचे वडील श्रीनिवास ओक हेही ठाणे न्यायालयात वकील होते. त्यांनी व्ही. पी. टीपणीस यांचं चेंबर जॉईन केलं. व्ही. पी. टीपणीसही उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. तसंच ते माजी लोकायुक्तही होते. अभय ओक यांनी अनेक जनहीत याचिकांमध्ये वकील म्हणून काम केलं. मुंबईत २९ ऑगस्ट २०१३ मध्ये अतिरिक्त वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर १२ नोव्हेंबर २००५ मध्ये त्यांची नियुक्ती ही पूर्णवेळ न्यायमूर्ती म्हणून झाली. मुंबई उच्च न्यायलयात असताना त्यांनी अनेक महत्वाचे निकाल दिले त्यापैकी रस्त्यांमधील खड्डे तसंच मुंबईतील प्रदूषण, अनधिकृत बांधकाम याविषयीचे निकाल होते.