सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात 112 ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. हिंदूंच्या लक्षावधी वर्षांच्या संस्कृतीतील अद्वितीय परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्कार्य गुरु-शिष्यांनी केल्याचा गौरवशाली इतिहास भारताला लाभला आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या, आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या आणि समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून तत्कालीन दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन केले अन् आदर्श अशा धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेची स्थापना केली. अशा महान गुरुपरंपरेचा वारसा जपण्याचा आणि श्री गुरूंच्या चरणी शरणागत भावाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा अनादि काळापासून चालू आहे. याच उद्देशाने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती अन्य समविचारी संघटनांसह यंदा देशभरात 112 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करत आहे. या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि गुरुपूजन; ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटनाचे अद्वितीय कार्य’ आणि ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अलौकिक कार्य या विषयांवरील लघुपट, समाजसेवी मान्यवरांचे राष्ट्र आणि धर्म रक्षणाविषयी मार्गदर्शन, तसेच ‘धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावरही मार्गदर्शन होणार आहे. जिल्ह्यात हा महोत्सव उदया सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे. ठाण्यात हा उत्सव वर्तकनगरच्या ब्राह्मण विद्यालयात होणार आहे.