ठाणे शहरात सध्या उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. उष्णतेची ही लाट आणखी काही दिवस राहील, असा हवामान खात्याचा इशारा आहे. त्या पार्श्वभूमीवर, ठाणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाने केले आहे. उष्माघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. तहान लागली नसली तरी सतत पाणी प्यावे. प्रवासात पाण्याची बाटली सोबत असावी. लिंबू पाणी, ताक, कोकम सरबत तसंच मिठाचे योग्य प्रमाण वापरावे. ऋतुमानानुसार उपलब्ध असणारी फळे -भाज्या यांचा आहारात उपयोग करावा. सैलसर कपडे वापरावे. घराबाहेर टोपी अथवा छत्रीचा वापर करावा. घरातील हवा थंड आणि खेळती रहावी. थेट सूर्यप्रकाशापासून घराचे संरक्षण करावे. लहान मुले, गरोदर स्त्रिया, घराबाहेर काम करणारे नागरिक, मानसिक दृष्टया आजारी असलेली व्यक्ती, शारीरिक दृष्टया आजारी असलेले नागरिक, इतर प्रदेशातून आलेले नागरिक यांनी उन्हातून बाहेर पडताना काळजी घ्यावी. चहा, कॉफी, मद्य यांचे सेवन करू नये. साखरेचे अधिक प्रमाण असलेली पेये घेऊ नयेत. हाय प्रोटीन आहार आणि शिळे अन्न खाऊ नये. उष्माघातामुळे होणारी कोणतीही लक्षणे आढळली तर, ताबडतोब महापालिकेच्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.