सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली संरक्षणाची गरज नसणाऱ्यांना पोलीस संरक्षण पुरवतात – आनंद परांजपे यांचा आरोप

ज्यांना धमकी आलेली आहे किंवा नाही, याची शहानिशा न करताच ठाणे पोलीस आयुक्तालयाने शेकडो जणांना पोलीस संरक्षण पुरविले आहे. जे पुढारी लोकप्रतिनिधीच्या कोणत्याही परिभाषेत समाविष्ट होत नाहीत. जे नोकर सत्ताधाऱ्यांच्या घरातील भाजी आणण्याचे काम करीत आहेत, त्या आणि सत्ताधाऱ्यांच्या सहाय्यकांसह ज्यांना संरक्षणाची गरज नाही अशा लोकांना पोलीस संरक्षण पुरवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या अंगरक्षकांना फुलांचे गुच्छ पकडण्यास लावत आहेत. तसेच त्यांना चक्क मिठाई आणण्यासाठी दुकानात पाठवले जात आहे. अशा पद्धतीने हे सत्ताधारी ठाणे पोलिसांचा अपमान करीत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत केला. 100 पेक्षा अधिक लोकांना जी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे त्याची यादी ठाणे पोलिसांनी जाहीर करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले. याबाबत अधिकृत माहिती जगजाहीर व्हावी यासाठी आनंद परांजपे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज केला आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी हे आरोप केले. कुठल्याही निकषानुसार पोलीस संरक्षणासाठी पात्र ठरत नाहीत, अशा लोकांनीही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. अगदी स्वीय सहाय्यकांच्या दिमतीला कार्बाइन धारक दोन पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. घरातील भाजीपाला खरेदीसाठी जाणाऱ्या नोकरालाही पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेले आहे. पोलीस संरक्षण ज्यांना पुरवण्यात आलेली आहे. त्यांची यादी अत्यंत धक्कादायक असल्याने ठाणे पोलीस ती यादी देणार नाहीत. त्यामुळेच आपण माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन ही सर्व माहिती मागवली आहे. 1 जून 2022 पासून ठाणे आयुक्तालयात जे-जे लोकप्रतिनिधी-केंद्रीय मंत्री,खासदार, राज्यातील मंत्री, आमदार असतील. यांच्या व्यतिरिक्त माजी लोकप्रतिनिधी, व्यावसायिक आणि इतर लोकांना सुरक्षा पुरवण्यात आली असेल तर त्याची तपशीलवार माहिती आपण मागवली आहे. त्यासाठी किती मनुष्यबळ लागत आहे. ज्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे, त्यांनी सुरक्षेसाठी अर्ज केला होता का? संबधित व्यक्तीला खरोखर धमकी आली होती का किंवा तसा अहवाल राज्य गुप्तवार्ता विभागाने सादर केला आहे का? तसेच हे संरक्षण सशुल्क की विनाशुल्क पुरविण्यात आले आहे का? अन् हे संरक्षण सशुल्क असेल तर किती जणांनी हे शुल्क अदा केले आहे? कोणाकोणाचे शुल्क जमा करण्यात आलेले नाही. आदी स्वरुपाची माहिती आपण ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेकडे मागवली आहे. पोलीस संरक्षण ज्यांना पुरवण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये काही व्यावसायिकही आहेत. त्यांचे व्यवसाय स्वच्छ की ‘काळे’ हे सर्वांनाच माहित आहे. म्हणूनच आपण ही माहिती मागवली आहे.
अजित पवार यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. आपणही अशीच विनंती करीत आहोत. शेखर बागडे हे जेव्हा कळवा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांचे वर्तन उद्धट , उर्मट आणि लोकसेवेला काळीमा फासणारे होते. लोकप्रतिनिधींशी बोलताना ते अरेरावी केल्या आहेत. याबाबत आम्ही अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. आता भाजपचेच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तशी मागणी केली आहे. मिंधे गट आणि भाजपाच्या वादाशी आपणाला देणेघेणे नाही. पण, शेखर बागडे हे वर्तन उद्धट, उर्मट अधिकारी आहेत. ते कोणाच्या आशीर्वादाने मानपाडा पोलीस ठाण्यात बसलेत हे सर्वांनाच माहित आहे. आमचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. किमान आता तरी चौकशी झाली पाहिजे; लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी होत असताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले पाहिजे, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे, असे ही परांजपे यांनी सांगितले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading