हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्यानिमित्त संस्कारभारती कोकण प्रांत ठाणे समितीतर्फे ९ हजार चौरस फूटाचं भूअलंकरण म्हणजे रांगोळीचं रेखाटन करण्यात आलं होतं. ठाण्याच्या गावदेवी मैदानावर रेखाटण्यात आलेल्या या रांगोळीचं उद्घाटन महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते झालं. भारतीय सैन्याला सलाम आणि ठाण्यातील पुरातन वास्तू या विषयावर ही रांगोळी रेखाटण्यात आली होती. मध्यभागी भारतीय सैनिक आणि शहीद जवानांना श्रध्दांजली म्हणून ४ पणत्या या रांगोळीत रेखाटण्यात आल्या आहेत. रांगोळीच्या कडेला भारतीय सैनिकांवरील काही चारोळ्या आणि कवितांचं रेखाटन करण्यात आलं आहे. तर रांगोळीच्या चारही बाजूला ठाण्यातील पुरातन वास्तू आणि मुंबई-ठाणे पहिल्या आगगाडीची प्रतिकृती कागदापासून तयार करण्यात आली होती. ही रांगोळी काढण्यासाठी ३०० किलो रांगोळी, ५०० किलो रंग आणि सलग ८ तास ३५ कलाकारांनी मिळून ही रांगोळी रेखाटली आहे. या रांगोळीबरोबरच प्रदीप गुप्ते यांच्या कागदापासून तयार करण्यात आलेली शिल्पं आणि कौस्तुभ ताम्हनकर यांचं शून्य कचरा व्यवस्थापन या विषयावर प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. रांगोळी आणि ही प्रदर्शनं उद्या रात्रीपर्यंत पाहता येतील.