संगीत हे समाजामध्ये संदेश देण्याकरिता सकारात्मक प्रभावी माध्यम असून या माध्यमाद्वारे स्वच्छतेचा संदेश पोहचणे आवश्यक असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितलं. संस्कृती आर्ट फेस्टीवलचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. संगीत ऐकल्यानं दैनंदिन ताणतणाव कमी होतो. या संगीताचा उपयोग सकारात्मक संदेश जनतेमध्ये पोहचवण्यासाठी होऊ शकतो. देशातील गावांमध्ये सुध्दा स्वच्छतेचा संदेश पोहचला असून त्यामुळं कुटुंबाच्या आरोग्याला कोणताही धोका उद्भवणार नाही. जिल्ह्यातील आदिवासी गावातील बांधवांच्या घरात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता अप्रतिम स्वच्छता त्या घरात दिसून आली असं राज्यपालांनी सांगितलं. यावेळी जिल्ह्यातील खेळाडू संजूकुमार सिंह यांना राज्यपालांच्या हस्ते शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. संस्कृती आर्ट फेस्टीवलमध्ये असलेल्या विविध स्टॉलना यावेळी राज्यपालांनी भेट दिली तर नंतर सुप्रसिध्द गायक कैलाश खेर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.