संगीत नाटकांना बालगंधर्वांनी सुवर्णकाळ निर्माण करून दिला. बालगंधर्व यांच्यामागे सयाजीराव गायकवाड आणि अनेक दिग्गज भक्कम उभे होते, त्यामुळे बालगंर्धवांनी संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखविला, पण दुर्देवाने आज संगीत नाटकांच्या मागे कुणीही उभे नाही, संगीत नाटके पुन्हा व्हावीत, यासाठी आम्ही सर्व सत्ताधा-यांना भेटलो, संगीत रंगभूमीसाठी काही तरी करायला पाहिजे, हे सर्वांना मान्य आहे, पण संगीत रंगभूमी उपेक्षितच आहे, अशी खंत पं. सुरेश साखवळकर यांनी व्यक्त केली. परम मित्र प्रकाशनच्या वतीने दिवंगत गायक पं. वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार्या पं. जयराम पोतदार यांनी लिहलेल्या संगीतसूर्य डॉ. वंसतराव देशपांडे या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलतांना पं. साखवळकर म्हणाले, काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न म्हणून शास्त्रीय संगीतावर आधारित नाट्यसंगीत बेतण्याचा प्रयत्न गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान नाटकात केला. त्यांचा हा प्रयोग संगीत रंगभूमीसाठी मैलाचा दगड ठरला. गोविंदराव टेंबेनी संगीत रंगभूमीला संगीत दिले, या संगीताची मूळ परंपरा संगीत मानापमाशी जोडलेली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. संगीत नाटकाना बालगंधर्वांनी जो सुवर्णकाळ निर्माण करून दिला, त्यानंतर मास्टर दीनानाथ, केशवराव भोसले, छोटा गंधर्व,प्रसाद सावकार यांनी संगीत रंगभूमी समृध्द केली,संगीत रंगभूमी साठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो आहोत. त्यांच्याच एक प्रयत्न म्हणजे पं. पोतदार यांनी लिहलेले कथामय नाट्यसंगीत आणि बहुआयामी नाट्यसंगीत होय, असे साखवळकर यांनी नमूद केले. संगीत तज्ञ पं. अमरेंद्र धनेश्वर यांनी पं. वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी सांगितल्या. पं. वसंतराव देशपांडे यांच्या संगीतावर आधारित झालेल्या छोटेखानी मैफलीला गायक श्रीरंग भावे, ऋग्वेद देशपांडे, अनंत जोशी आणि विघ्नेश जोशी यांनी स्वरसाज चढवला.