नागरिकांना अवयवदानाचं महत्व पटवून देण्यासाठी श्री व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून अवयवदान जनजागृतीची उधळण करण्यात येणार आहे. परमार्थाचं परमोच्च स्थान म्हणजे दान. दान करताना कोणताही स्वार्थ आडवा येऊ नये अशी भावना आहे. रक्तदान, नेत्रदान याबाबत जागृती असली तरी अवयवदानाबाबत फारशी जागृती नाही. भारतामध्ये पुनर्जन्म संकल्पनेवर अनेकांचा विश्वास आहे. आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान किंवा अवयवदान केलं तर पुनर्जन्मामध्ये ते अवयव आपल्याला मिळणार नाहीत अशी भावना असते. त्यामुळं अवयवदानाबाबत प्रबोधन आणि जागृती व्हावी यासाठी नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. श्री व्यापारी मित्रमंडळाचं यंदाचं ३९वं वर्ष असून नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये अवयव दानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी १० दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी मदत केलेल्या आणि अवयव प्रत्यारोपण झालेल्या रूग्णांच्या हस्ते सकाळची पूजा केली जाणार असून सायंकाळची आरती नेप्रोलॉजिस्टच्या हस्ते होणार आहे. या नवरात्रौत्सवाच्या १० दिवसात १० हजार अवयवदानाचे अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट असल्याचं विलास ढमाले यांनी सांगितलं.