शून्य कचरा दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने स्वच्छता संग्राम रॅली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 5 हजारांहून अधिक महिला आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होत स्वच्छ, सुंदर,पर्यावरणशील नवी मुंबईचा एकमुखाने गौरव केला. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभलेल्या नवी मुंबई महापालिकेने यावर्षीच्या सर्वेक्षणात देशात पहिल्या क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून ‘निश्चय केला, नंबर पहिला’ म्हणत नागरिकांच्या सहयोगाने त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे. नेरुळ सेक्टर 26 येथील गणपतशेठ तांडेल मैदानात महिला संस्था, मंडळे, बचत गट यांच्या महिला प्रतिनिधी तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, विद्यार्थी यांनी एकत्र येत, स्वच्छता कार्यातील महिलांचा सहभाग आणि त्यांचे नेतृत्व वृध्दींगत व्हावे यादृष्टीने ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत देश पातळीवर ‘स्वच्छोत्सव 2023’ हा उपक्रम राबविला.