ठाणे महापालिकेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत सातत्य असून, घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती गंभीर असतानाही कोट्यवधींची उधळपट्टी सुरू आहे. एकिकडे कर्ज घेण्याची वेळ आली असताना, बिल्डरांना शुल्कमाफी दिली गेली. तर ताब्यात नसलेल्या गायमुखच्या चौपाटीच्या विकासासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या बेफिकीर कारभारामुळेच एकेकाळी श्रीमंत महापालिकेवर कर्जासाठी हात पसरण्याची वेळ आली आहे, अशी जोरदार टीका आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.कोविड आपत्तीच्या काळामध्ये अनेक घोटाळ्यांची मालिका सुरूच होती. ग्लोबल कोविड आणि पार्किंग प्लाझा येथील हॉस्पिटलमधील गैरप्रकारांना जबाबदार कंत्राटदार ओम साई आरोग्य केअर कंपनीला पाठिशी घातले जात आहे. कोविड प्रतिबंधात्मक साहित्यातील खरेदी आणि कंत्राटातील भ्रष्टाचारा पाठोपाठ नालेसफाईमध्ये हातसफाई झाल्याचे उघडकीस आले. ठाणेकरांवर अनावश्यक प्रकल्प आणि योजना लादून महापालिका प्रशासन लूट करीत आहे. कोविड रुग्ण वा लस घेतलेल्या एका व्यक्तीची फोनवरून विचारपूस करण्यासाठी तब्बल १५ रुपये खर्च हे उधळपट्टीचे अनोखे उदाहरण आहे. तर महापालिकेच्या ताब्यात नसलेल्या गायमुख चौपाटीच्या विकासासाठी २२ कोटींचा खर्च करण्यात आला. बिल्डरांना ५० टक्के प्रिमियम माफी देऊन महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करण्यात आले. तिजोरी रिकामी असताना बिल्डरांना शूल्कमाफीचा निर्णय कसा घेतला, हे आकलनापलीकडे आहे. ३०८ कोटींचा मेट्रो सेस बिल्डरांकडून वसूल केला गेला नाही. अशा प्रकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे एकेकाळच्या श्रीमंत महापालिकेवर सत्ताधारी शिवसेनेमुळेच हात पसरण्याची वेळ आली. कर्जफेड करण्यासाठी ठाणेकरांवर छुपे कर लादले जातील अशी भीती केळकर यांनी व्यक्त केली. स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्र सरकारकडून ठाणे महापालिकेला सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधी आला. मात्र, या निधीच्या वापराचे चुकीचे अहवाल सादर करून सत्ताधारी शिवसेनेने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. आगामी काळात या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी लाचलुचपत विभाग आणि केंद्र सरकारच्या नगर विकास खात्याकडे करण्यात येईल अशी माहिती निरंजन डावखरे यांनी दिली.