मराठा क्रांती मोर्चाच्या ठाणे जिल्हा शाखेनं शिवसेना-भारतीय जनता पक्षाला जाहीर केलेल्या पाठिंब्यावरून मराठा क्रांती मोर्चामध्ये मतभेद निर्माण झाल्याचं दिसत आहे. काल एका पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्ह्यातील समन्वयकांनी मराठा आरक्षण, हॉस्टेल यांच्यासह मराठा समाजाचे अनेक प्रश्न आणि मागण्या मार्गी लावण्यासाठी सहकार्य करणा-या ठाणे-पालघर जिल्ह्यातील शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवारांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील वसतीगृहाचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने स्वतंत्र स्मारक उभारण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळं शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या दुस-या गटानं कैलास म्हापदी यांच्या पाठिंब्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाचा काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला दिलेला पाठिंबा हा म्हापदी यांचं वैयक्तीक मत असल्याचं या गटानं म्हटलं आहे. यासाठी मराठा क्रांती मोर्चामध्ये कोणतीही बैठक अथवा ठराव झालेला नसून हे त्यांनी वैयक्तीक फायद्यासाठी केल्याचा आरोप या गटानं केला आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे विनोद पोखरकर हे अधिकृत उमेदवार असताना हे वक्तव्य चुकीचं आहे. आम्ही तुरूंगात असताना ही मंडळी कुठे गेली होती असा प्रश्न या गटानं उपस्थित केला आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला पाठिंबा देण्याच्या घोषणेचा निषेध करण्यात आला आहे. व्हॉटस् ॲपवर पाठवलेल्या संदेशात निखिल जाधव, अक्षय आंबेकर, विनोद जाधव, सुनिल पाटील, अनिकेत गावडे, अल्पेश महाडीक, राजेश बागवे, तेजस रेणुसे यांची नावं आहेत.