शहरातील गर्दीची ठिकाणं आणि आठवडी बाजार तात्काळ बंद करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी शासनानं जलतरण तलाव, मॉल्स, सिनेचित्रपटगृह बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याच धर्तीवर शहरातील सर्व प्रभागातील आठवडा बाजार, गर्दीची ठिकाणं, चायनीज गाड्या, हातगाड्या तात्काळ बंद करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले आहेत. संध्याकाळच्या वेळी खाऊ गल्ली, चायनीज तसंच हातगाड्यांवर होणारी खवय्यांची गर्दी लक्षात घेता आजपासून सर्व हातगाड्या तसंच आठवडी बाजार तात्काळ बंद करावेत असे आदेश महापौरांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. सर्व आठवडा बाजार, हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात पथक तयार करावे आणि या पथकाच्या माध्यमातून शहरात कुठेही आठवडा बाजार, हातगाड्या तसंच चायनीज गाड्या तात्काळ बंद करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनीही आपली स्वत:ची जबाबदारी समजून आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे आणि महापालिका करत असलेल्या सूचनांचे पालन करावे असं आवाहनही महापौर नरेश म्हस्के यांनी केलं आहे.