भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध योजनांच्या देशभरातील लाभार्थ्यांशी 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. जिल्हास्तरावर या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आणि पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हास्तरावर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान पदाच्या नावाने असलेल्या विविध १३ योजनांच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बोलवण्यात आले असून पालकमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आदी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. यावेळी विविध योजनांविषयी ध्वनीचित्रफित दाखविण्यात येणार आहे. स्थानिक कार्यक्रमानंतर सुमारे ११ वाजेच्या सुमारास राष्ट्रीयस्तरावरील कार्यक्रमास सुरूवात होईल. यावेळी पंतप्रधान निवडक जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधतील.