मुदतीआधीच विम्याचा परतावा मिळवून देण्याच्या प्रलोभनाने विमा ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या पाच सायबर भामट्यांच्या टोळीला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आशिषकुमार तिवारी, भाऊराव आखाडे, विनित झा, विनय तावडे आणि निखील नारकर अशी अटक आरोपींची नावे असुन सर्वजण तिशीतील तरुण आहेत. खाजगी विमा कंपनीचे माजी कर्मचारी असलेल्या या भामट्यांनी ठाण्यातील आयटी क्षेत्रातील महिलेची 17 लाखांची फसवणुक केल्याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी अथक प्रयत्न करून या भामट्यांचा छडा लावला. या भामट्यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यातही असेच कारनामे केल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाचपाखाडी परिसरात राहणाऱ्या 45 वर्षीय महिला आयटी क्षेत्रात काम करतात. त्यांनी भारती एक्सानामक खाजगी विमा कंपनीच्या 5 पॉलिसी घेतल्या होत्या. दरम्यान, 21 जून रोजी सुमित आहुजा नामक व्यक्तीने विमा कंपनीच्या नावे ई-मेल पाठवुन पॉलिसीच्या प्लॅनमध्ये दिशाभूल झाल्याचे भासवुन विमा परतावा मिळवून देण्याच्या प्रलोभनाने 17 लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी 20 जुलैला नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी महिलेला आलेल्या मोबाईल क्रमांकांचा तांत्रिक तपास केला असता, यातील आरोपी हे डोंबिवली आणि मुंबईत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी आशिषकुमार, भाऊराव, विनित, विनय आणि निखील यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली.यातील विनय तावडे हा विमा ग्राहकांची माहिती पुरवित असे तर,इतर भामटे सुमित आहुजा व विनित गोयल या बनावट नावाने ग्राहकांना कॉल करीत असत.पूर्वी विमा कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या या भामट्यांनी मुंबई, पुणे आणि ठाण्यातील नागरिकांची फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.आरोपींनी फसवणुकीतील रक्कमेमधुन अनेक मालमत्ता खरेदी केल्या होत्या.या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.