मुरबाड तालुक्यातील वाल्हीव्हरे गावचे सरपंच रघुनाथ खाकर आणि कळबांड गावच्या आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडीवले यांच्याशी आज मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सरपंच आणि आशा स्वयंसेविका यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी या संवादाच्या कार्यक्रमात या दोघांनी मनोगत व्यक्त करताना आपापल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि कोरोनावर नियंत्रण मिळवताना कशाप्रकारे उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
सरपंच खाकर यांनी गावात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढलेला नसून गाव पूर्णतः कोरोनामुक्त आहे. गावात संसर्ग होऊ नये यासाठी मार्च २०२०लाच गाव लॉकडाऊन केले. गाव दक्षता कमिटी स्थापन करून नागरिकांना कोरोना या विषाणूची आणि लक्षणाची माहिती दिली. नागरिकांची भीती कमी करून त्रिसूत्रीचे नियम पटवून दिले. गावाला वारंवार हात धुण्याची सवय लावली. गाव मालशेजच्या पायथ्याशी असल्याने पर्यटकांची गर्दी होऊ नये यासाठी गर्दीनियंत्रणावर भर दिला. संपूर्ण गावात आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप केले. गावातील प्रत्येक नागरिकाचे सर्वेक्षण केले. तसेच गावातल्याच जंगलात मिळणारी ‘गुळवेल’ गावातल्या प्रत्येक घरात वाटप केले त्यामुळे लोकांनी ‘गुळवेल’ चा काढा प्यायले. त्याचबरोबर गावातील जास्तीत नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात यश आले. तिसऱ्या लाटेची देखील गावाची तयारी केली असून गावकरी उत्तम सहकार्य करत आहेत त्यामुळे गाव अखेरपर्यंत कोरोनामुक्त राहील असा ठाम निर्धार खाकर यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडीवले यांनी देखील कोरोनाच्या काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाच्या वेळी सर्वेक्षण करून कोरोना रूग्णासह क्षयरोग, मधुमेय, कर्करोग, सारी, उच्चरक्तदाब,आदि आजाराच्या व्यक्तींना देखील संदर्भसेवा दिल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले.