वारकरी संप्रदाय हा एक जातीय आणि धर्मिय नाही तर ही परंपरा सर्व जातीय आणि धर्मीय आहे. पूर्वी ४० मुस्लिम संत आणि किर्तनकार होऊन गेले तर आज २२ मुस्लिम किर्तनकार प्रबोधनाचं कार्य करत आहेत असं हरिभक्त पारायण श्यामसुंदर महाराज यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील संत परंपरा या वी नीड यू सोसायटीनं आयोजित केलेल्या दोन दिवसीय शिबीरात संत परंपरेसमोरील आव्हाने या सत्रात ते बोलत होते. वारकरी किर्तनाची परंपरा चुकीच्या दिशेनं जात आहे. पाऊस न पडण्याची वैज्ञानिक कारणं न सांगता यज्ञ न केल्यामुळे पाऊस पडत नाही म्हणून दुष्काळ पडतो असं सांगणारे किर्तनकार हे आव्हान आहे असं त्यांनी सांगितलं. अहंकार हा शत्रू आहे पण हाच अहं वारकरी परंपरेचा घात करत आहे. धर्म महत्वाचा आहेच पण त्यातील अयोग्य परंपरा, विषमता वाढवणा-या गोष्टी तसंच समाजात दुही माजवणा-या विचारांविरोधात काम करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. महिला पुरूषांपेक्षा खंबीर असतात आणि आहेत कारण लाखो शेतक-यांनी आत्महत्या केल्या पण एकाही शेतकरी महिलेनं आत्महत्या केली नाही. हे बळ तिला वारकरी परंपरेनं दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. जिथे लोकं जमतात तिथे तिथे राजकारण जन्माला येतं त्यामुळं समाजाची मानसिकता कळली नसेल तर परिवर्तन कसं करणार असा प्रश्न देवदत्त परूळेकर यांनी उपस्थित केला.