वाढलेल्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली असून ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. दरम्यान, प्रत्येक निवडणुकीत नवीन घोषणा केल्या जात आहेत. मात्र, महागाई कमी होत नाही. आता महागाई कमी कधी होणार ह्यांची घोषणा कधी करत्यात याची आम्ही वाट बघतोय, अशी टीका ऋता आव्हाड यांनी केली. गेल्या काही महिन्यांपासून महागाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पेट्रोल-डिझेलसह अनेक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दरही वाढत असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ झाली आहे. आधीच लॉकडाउननंतर सामान्य माणसाचे जगणे असह्य झाले असताना, आता सरकारने घरगुती सिलिंडरच्या दरात देखील चांगलीच वाढ केली आहे. सिलिंडर महागल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.त्यामुळेच इंधन व स्वयंपाक गॅसची दरवाढ कमी करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महागाईचा भस्मासूर, पगार कपात, नोकरी, जाण्याची भीती, त्यात सतत पेट्रोल डिझेलची दरवाढ, स्वस्त झाले मरण आणि महागले पेट्रोल आदी फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधले. ब-याचश्या कंपन्या बंद पडल्या आहेत. ब-याचश्या छोट्या छोट्या उद्योगांना प्रचंड फटके बसले आहेत. मुलांच्या शाळेची फी भरायला पालकांची ऐपत नाही. मुलांना शिक्षण कसे द्यायचे, त्यांचा आजारपणाची बिल कशी भरायची, असा प्रश्न पालकांसमोर आहे. या सगळ्या गोष्टींचा महागाईचा परिणाम निव्वळ खाण्या पिण्यावर नाही तर सबंध जीवनावर झाला आहे. त्यामुळेच भाजप सरकारचा बुरखा फाडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.