वाघबिळ गावाशेजारील खाडी किनारी सुरु असलेले मेट्रो कास्टिंग यार्डचे काम स्थानिकांनी आज बंद पाडले.हिरानंदानी इस्टेट येथे वाघबिळ गावाशेजारील खाडी किनारी एमएमआरडीए च्या माध्यमातून रिलायंन्स कंपनीला मिळालेल्या ठेक्याद्वारे मेट्रो कास्टिंग यार्डचे काम सुरु असून याठिकाणी ग्रामस्थांच्या जमिनी बळजबरीने रिलायंन्स कंपनीने ताब्यात घेवून त्याठिकाणी असलेल्या खारफुटीवर बेकायदेशीर भरणी टाकून दोन महिन्यांपासून काम सुरु केले आहे. ज्यावेळी या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू होती त्यावेळी शेतकऱ्यांनी विरोध केला असता आमदार प्रताप सरनाईक यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचेकडे बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये ज्यांच्या जागा या कास्टिंग यार्डसाठी वापरण्यात येतील त्यांना मेट्रोचे काम संपल्यानंतर त्या परत करण्यात येतील आणि जो पर्यंत हि जागा रिलायंन्स कंपनी वापरेल तो पर्यंत स्थानिक शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला दिला जाईल असे सांगितले होते. त्याचबरोबर त्या परिसरातील भूमिपुत्रांना त्यांच्या योग्यतेनुसार बिल्डींग मटेरियल सप्लायर्स, रेडीमिक्सर, माथाडी काम तसेच इतर कामांमध्ये नोकऱ्या देण्यात येईल असे रिलायंन्स कंपनीचे या प्रोजेक्ट्चे उपाध्यक्ष प्रवीण जोशी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांना आश्वासन दिले होते. परंतु काम चालू होवून दोन महिने झाल्यानंतर सुद्धा अद्याप पर्यंत स्थानिकांना रोजगार, नोकऱ्या न देता बाहेरच्या लोकांनाच काम दिली जात असल्याने आज स्थानिक ग्रामस्थांनी आणि बेरोजगार तरुणांनी रिलायंन्स कंपनीचे काम बंद पाडले. जर एका आठवड्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर काम केले नाही आणि स्थानिकांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करून लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.